गडचांदूर–सिद्धेश्वर रस्ता जिवघेण्या स्थितीत; अपघाताची भीती
चंद्रपूर प्रतिनिधी :
गडचांदूर येथून सिद्धेश्वरकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब व जिवघेण्या अवस्थेत असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. हा रस्ता आसिफाबाद रोडला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने सिद्धेश्वर तसेच आसिफाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा सर्वात जवळचा व सोयीचा रस्ता मानला जातो. मात्र रस्त्याची विदारक अवस्था पाहता हा मार्ग अपघातांना आमंत्रण देत आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे कडे तुटलेले असल्याने दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांना कसरतीचा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढतो. यामुळे अनेक वेळा नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्याचे काम त्वरित हाती घेणे गरजेचे आहे.
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घ्यावी, तसेच लोकप्रिय आमदार मा. देवरावदादा भोंगळे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा संघटक देवीदास नंदनवार यांनी केली आहे.













