भ्रष्टाचाराविरोधात तातडीने कारवाईची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे निवेदन
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) — चाळीसगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शासन नियमांचे उल्लंघन करून नागरिकांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी समितीच्या वतीने शासकीय विश्राम गृहापासून तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत पर्यंत मोर्चा काढत निवेदन देत करण्यात आले. समितीने दिलेल्या निवेदनानुसार, तलाठी, ग्रामसेवक, गिर्दावर, कृषी सहाय्यक, नर्स, डॉक्टर्स, वायरमन आदींनी शासनाने ठरवून दिलेल्या सज्जामध्ये न राहता खोटे दाखले देऊन घरभाडे घेतले आहे. यामुळे शासन आणि जनतेची फसवणूक झाली असून, फसवणुकीसाठी भारतीय दंड संहिता कलम 420 नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विहिरी व घरकुल मंजुरीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांकडून पाच हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. घेतलेली लाच लाभार्थ्यांना परत देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अनेक गावांमध्ये नागरिकांना रेशन कार्ड न देणे, धान्य न वाटप करणे, ऑनलाइन नाव असूनही प्रणालीत नाव न दिसणे, तसेच नवीन रेशन कार्डसाठी तीन ते पाच हजार रुपयांची लाच घेण्याचे प्रकार समोर आल्याचे समितीने नमूद केले. तालुक्यातील आदिवासींना रहिवासी दाखले व आधार कार्ड न मिळाल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याचे सांगण्यात आले. मौजे शिंदी चत्रभुज येथे जलजीवन योजनेसाठी मंजूर 3 कोटी 17 लाख निधीवर ग्रामपंचायतीकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अनेक गावांमध्ये शौचालय, गटार व सांडपाणी व्यवस्थेचा निधी हडप केल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांसाठी बंधनकारक पाच टक्के निधी अन्य कामांवर खर्च केला जात असून, ज्येष्ठ नागरिकांना व निराधारांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचे नमूद केले आहे. मौजे रोकडे गावातील 2021 मधील ढगफुटीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना अद्याप मदत मिळालेली नसल्याचे सांगून त्यांना मोबदला देऊन गहाळ कागदपत्रे तातडीने तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये रस्ते, नाली व वित्त आयोगाच्या कामांसाठी मंजूर निधी अभियंत्याच्या संगनमताने हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. समितीने वरील सर्व मागण्यांवर तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याचे आवाहन केले असून निवेदनात केले आहे तसे न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खांडपूरकर, राष्ट्रीय सन्मव्यक हितेश दाभाडे, प्रदेशाध्यक्ष सैनिक विभाग उल्हास पाटील, प्रदेशाध्यक्ष निवड समिती अनिल देसले, प्रदेशाध्यक्ष दिव्यांग काशिनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष एडवोकेट राणीताई स्वामी, प्रदेशाध्यक्ष ब्रिक्स सुनील जाधव, जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष समाधान पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवा काळे पाटील, मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष सोनल पाटील, आखिल भारतीय भष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती तालुकाध्यक्ष नवनाथ मांडे, ब्रिक्स ह्यूमन राइट्स अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, शहराध्यक्ष बबलू अहिरे, राजेंद्र चौधरी उपाध्यक्ष, अनिल राठोड उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष निर्मला चौधरी, मनीषा मांडे, सोमनाथ गायकवाड, भगवान गायकवाड आण्णा विसपुते, लक्ष्मण वाघ, नथा रावते, रविंद्र निकम, मुकेश नेतकर, सागर निकम, गणेश बच्छाव, जिल्हा अध्यक्ष आदिवासी विभाग भगवान गायकवाड, तालुका अध्यक्ष आदिवासी विभाग, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष गजानन काळे, उपाध्यक्ष प्रवीण ठाकरे, धुळे महानगर अध्यक्ष योगेश पाटील, धुळे युवा महानगर अध्यक्ष राम खैरनार, चाळीसगाव तालुका संघटक भिकन पाटील व तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.













