३१ डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी सह्याद्री प्रतिष्ठानचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.
(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर संवर्धन कार्य करत असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहे. महाराष्ट्रातील तमाम गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेतील बलस्थाने असून अनेक मावळ्यांनी त्यासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यावर अनेक समाध्या व देवी देवतांची मंदिरे आहेत म्हणून हे गडकिल्ले पवित्र तीर्थस्थाने म्हणून सर्व मानतात, या गडकिल्ल्यांवर दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी काही ठराविक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे लोक दारू मटणच्या पार्ट्यांचे आयोजन करून त्या ठिकाणी हिडिसपणा धिंगाणा घालण्याचे काम करीत असतात, यामुळे गड किल्ल्यांचे पावित्र्य भंग होते आणि गड प्रेमी शिवप्रेमी ही गोष्ट खपवून घेत नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी वाद-विवाद होण्याची शक्यता असते, म्हणून सँह्याद्री प्रतिष्ठान कडून पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्ले राजदेहरे, किल्ले कन्हेरगड, किल्ले मल्हारगड, या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस गस्त ठेवावी तसेच या ठिकाणी दारू मटणाच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारचे उपद्रव कोणी करणार नाही, आपल्याला आवश्यकता वाटल्यास आपण सूचना केल्यास सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या मदतीस देखील हजर राहू शकतील अशा आशयाचे निवेदन आज चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, तालुकाप्रमुख गणेश पप्पू पाटील, बाळासाहेब सोनवणे, जयवंत शेलार, ललित चौधरी, दर्शन चौधरी, सचिन पाटील, बबलू चव्हाण, मयूर भागवत, संजय ठाकूर, संजय पवार, मुकुल भागवत, नृतेश भागवत, धनंजय कुलथे, यांच्यासह सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.













