भाग ३
तीन घाटांचा लिलाव; तरीही अवैध रेती उपसा सुरूच? कारवाईची प्रतीक्षा
कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे
कोरपना तालुक्यात शासनामार्फत तीन रेती घाटांचा अधिकृत लिलाव करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात रेती उत्खनन नियमांनुसार होत आहे का, याबाबत नागरिकांमध्ये मोठी शंका व्यक्त केली जात आहे. लिलाव झालेल्या घाटांसह तालुक्यात सुरू असलेल्या सर्व रेती उत्खननाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, नदीपात्रातून होणाऱ्या अनियंत्रित व नियमबाह्य रेती उपशामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीकाठच्या शेतीवर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. भूजल पातळी खालावत असून ग्रामीण भागातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. यामुळे शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रेती उत्खननाबाबत प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “तीन घाटांचा लिलाव झाला, मग नियमबाह्य रेती उपसा कसा सुरू आहे?”, “रेती माफियांना अभय कोणाचे?”, “कारवाई का होत नाही?” असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उघडपणे विचारले जात आहेत.
नियमांचे उल्लंघन करून रेती उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
जनतेचा सवाल
“प्रशासनाचे दुर्लक्ष की संगनमत?”
अवैध रेती उपसा रोखण्याची जबाबदारी असलेल्या महसूल, पोलीस व खनिकर्म विभागाने आता संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून वास्तव परिस्थिती जनतेसमोर आणावी. अन्यथा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होत असलेले प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











