राजकीय वरदहस्तामुळे रेती माफिया बेलगाम?
राजुरा विधानसभा क्षेत्रात अवैध रेती उपशाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
कोट्यवधींच्या महसुलाला चुना, पर्यावरण धोक्यात; कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी
कोरपना प्रतिनिधी :
राजुरा विधानसभा क्षेत्रात अवैध रेती उपशाचा काळाबाजार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राजकीय नातेवाईकांच्या आश्रयाखाली काही रेती माफिया दिवस-रात्र नदीपात्रातून रेतीचा उपसा करत असल्याचे गंभीर आरोप होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा अवैध व्यवसाय फोफावत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
वर्धा नदीसह विविध नदीपात्रांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महसूल, खनिकर्म व पोलीस विभागाच्या नाकावर टिच्चून रेतीची वाहतूक होत असल्याने नेमके कोणाच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सुरू आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
अवैध रेती उपशामुळे शासनाच्या तिजोरीत जमा होणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून नदीपात्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्याबरोबरच भूजल पातळीवरही गंभीर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
नवीन पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या असल्या तरी रेती माफियांवर अद्याप निर्णायक कारवाई झालेली नसल्याची भावना जनतेत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
*जनतेचा थेट सवाल*
“सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई होते, मग रेती माफियांना अभय कोणाचे?”
राजुरा विधानसभा क्षेत्रातील अवैध रेती उपशाचे वास्तव समोर आणून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.
*विशेष*
“रेती माफिया मजबूत की प्रशासन कमकुवत?”
हा प्रश्न सध्या राजुरा विधानसभा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. जनतेच्या नजरा आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत.












