भाग 2
मौनामागचे गूढ काय? जनतेचा संतप्त सवाल
कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे
कोरपना तालुक्यात अवैध रेती उपशाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि स्थानिक स्तरावर होत असलेल्या चर्चांनंतरही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
नियम व अटींचे उल्लंघन करून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असल्याचे आरोप होत असताना महसूल, खनिकर्म व पोलिस विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना संबंधित अधिकारी नेमकी कोणती पावले उचलत आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याहूनही गंभीर बाब म्हणजे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची जबाबदारी असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींनी या विषयावर मौन धारण केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अवैध रेती व्यवसायाला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळत आहे का, अशी चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे.
पर्यावरणाची हानी, नदीपात्रांची होणारी झीज आणि शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. अवैध रेती उपशामागील सत्य जनतेसमोर आणून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











