फलटणमध्ये राजे गटाची पराभवाची हॅट्रिक होणार की कमबॅक करणार ; मा.खासदार गटाची चारही बाजूने जोरदार फिल्डिंग
सातारा: गेली 35 वर्ष फलटण तालुक्यावर एक हाती सत्ता असलेल्या राजे गटाची विधानसभा नंतर झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजे गटाने संपूर्ण ताकद झोकून देत ते अस्तित्वाची लढाई लढत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला मा.खासदारांच्या व आमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप व राष्ट्रवादी यांनी राजे गटाला चारी बाजूने घेरत कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचे सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी तसेच पंचायत समितीवर सत्ता प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
मागील दोन्ही निवडणुकीत राजे गटाच्या अनेक शिलेदारांनी साथ सोडत मा.खासदार गटाची साथ धरली आहे. सद्यःस्थितीत राजे गट एकाकी पडला असून अस्तित्व टिकवण्याची लढाई म्हणून ते लढत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढून झालेली चूक भरून काढत त्यांनी नगरपालिका निवडणुकीत सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेना सोबत जाण्याचा मार्ग निवडला. मार्ग निवडण्यामागे साहजिकच अनेक कारणे आहेत. मात्र, शिवसेना पर्याय निवडेपर्यंत फलटण शहरातील राजे गटाच्या जवळपास सर्वच शिलेदारांनी मा.खासदार गट यांची साथ धरली होती. त्यामुळे नगर पालिका निवडणुकीत राजे गटाला उमेदवार मिळवण्यासाठीपासून संघर्ष करावा लागला. तर नगराध्यक्षपदासाठी समोरून मा.खासदार यांचे बंधू उभा राहिल्याने साहजिकच राजे गटाला देखील घरातीलच म्हणजे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे यांना रणांगणात उतरावे लागले. मात्र, जनतेशी त्यांचा थेट कनेक्ट नसल्याने फलटणच्या जनतेने त्यांना नाकारले.
सलग दोन पराभव झाल्यानंतर आता होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजे गटाने अस्तित्वाची लढाई म्हणून ते लढत आहेत. सद्यस्थितीत राजे गटाकडे सरदार यांची संख्या अल्प असून लढाई ही मावळ्यांच्या सहकार्याने लढावी लागत आहे. त्यांच्याकडे असलेल्या श्रीराम व दत्त शुगर, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, गोविंद मिल्क, कमिन्स ही मोठी जमेची बाजू आहे.
तर समोर मा.खासदार यांच्यासोबत फलटण तालुक्यातील बहुतांश सर्व बाजूचे दिग्गज नेते सोबत आहेत. मात्र, त्यापैकी काही नेत्यांबद्दल देखील ग्राऊंडवर अनेक कारणांनी नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्याचे आव्हान खासदार यांना करावे लागणार आहे. ते त्यांनी जाणले म्हणूनच दूधेबावी येथील सभेत त्यांनी भाष्य देखील केले. साहजिकच त्यांनी त्यानंतर स्वतः ग्राउंड कनेक्ट सुरू केला असेलच.
एकूणच गेल्या 30 वर्षात प्रथमच एक ही नाईक निंबाळकर ह्या निवडणुकीच्या रणांगणात नाही.हे वैशिष्ट्य असले तरी लढाई जोरदार होत असून साहजिकच मतदानाच्या आदल्या रात्रीच जो काय तो खऱ्या अर्थाने प्रचार होणार आहे. आता जो काही प्रचार होत आहे ती आरोपचरिकता. तूर्त एवढेच.












