साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले....
===================
सातारा – ३ जानेवारी २०२६
( सातारा प्रतिनिधी )
सातारा येथे सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्याची घटना आज संमेलनस्थळी घडली असून, त्यामुळे संपूर्ण साहित्य संमेलन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे उपस्थित साहित्यिक, प्रतिनिधी तसेच रसिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.आधीच विविध मुद्द्यानी गजलेले हे साहित्य संमेलन आजच्या या प्रकरणामुळे
संमेलनात गंभीर वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आंदोलनकर्ते संदीप जाधव यांनी संमेलनाच्या ठिकाणी अचानक प्रवेश करत गनिमी कावा करून ही कृती केली. कुणालाही संशय येऊ न देता ते संमेलनस्थळी पोहोचले आणि थेट कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले. हा प्रकार घडताच संमेलनस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही काळासाठी कार्यक्रम थांबवण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाली.
विशेष म्हणजे सातारा येथे सुरू असलेले हे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना देखील विरोध सुरू असल्याचे बोलले जात होते आणि त्यांच्या विरोधात आंदोलन होण्याच्या चर्चाही आधीपासून रंगल्या होत्या. संमेलनातील काही भूमिका, वक्त्यांची निवड तसेच एकूण आयोजन पद्धतीवरून काही घटकांकडून असंतोष व्यक्त केला जात होता. अशा पार्श्वभूमीवर आज घडलेली ही घटना संमेलनावरील तणाव अधिकच वाढवणारी ठरली आहे.
या घटनेत वापरण्यात आलेल्या काळ्या पदार्थामध्ये केमिकल असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याची माहिती समोर आली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी या घटनेने संमेलनाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी आंदोलनकर्ते संदीप जाधव यांना शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. संमेलनस्थळी सुरक्षा व्यवस्था असूनही ही घटना कशी घडली, सुरक्षा यंत्रणेत नेमकी कोणती त्रुटी राहिली, याचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच या आंदोलनामागील नेमका उद्देश काय होता आणि कोणत्या मागण्यांसाठी हा प्रकार करण्यात आला, याबाबतही चौकशी सुरू आहे.










