विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी फलटणमध्ये एकवटले सामाजिक कार्यकर्ते;
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, धरणे आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगीची मागणी
फलटण : देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या गैरप्रकारांविरोधात आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शविण्यासाठी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिकांनी आज निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, फलटण यांना निवेदन सादर केले. दि. २० जुलै २०२६ रोजी फलटण येथे एकदिवसीय शांततापूर्ण धरणे आंदोलन आयोजित करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, 1)देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या NEET तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
2) विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी पारदर्शक, जबाबदार आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा प्रणाली उभारणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
3)या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,
4)शिक्षण व्यवस्थेत तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात आणि शिक्षण क्षेत्र राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व न्यायाला प्राधान्य देण्यात यावे,
अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
आयोजित करण्यात येणारे धरणे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिली.
यावेळी सतीश गाढवे, कालिदास चोरमले, राजेंद्र भिसे, अमोल रासकर, नानासो गोवेकर, अक्षय चोपडे, यश चांगण, नितीन सुळ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या महत्त्वाच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि दि. २० जुलै रोजी होणाऱ्या शांततापूर्ण धरणे आंदोलनास प्रशासनाने आवश्यक परवानगी द्यावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.













