नराधमांकडून अत्याचार होण्याआधीच कसे करायचे मुलींनी स्वतःचे संरक्षण ?
जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेत विद्यार्थिनींना देण्यात आले स्वरक्षणाचे धडे.
धुळे प्रतिनिधी : जिल्ह्यात वाढत्या मुलीवरील अत्याचार, छेडछाड, तसेच विद्यार्थिनींना अचानक उद्भवणाऱ्या संकटांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या “वीरांगना” स्वसंरक्षण प्रशिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थिनींना आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि संकटसमयी सक्षम बनवणे हे आहे.
धुळ्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सुरू झालेल्या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी विसपुते यांनी सांगितले की, विद्यार्थिनींचे रक्षण केवळ व्यवस्थेवर अवलंबून नसून त्यांना स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता असणे अत्यावश्यक झाले आहे. समाजातील बदलत्या परिस्थितीत मुलींनी मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या बळकट असणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमातून आत्मभान, सावधगिरी आणि योग्य प्रतिसादाची सवय विद्यार्थिनींमध्ये विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











