महिला सक्षमीकरणासाठी भगूरमध्ये प्रथमच भव्य सोहळा; उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गुणगौरव
नाशिक | प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमी भगूर येथे प्रथमच परिपूर्ण पद्धतीने महिला सक्षमीकरण सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. घर आंगण बहुद्देशीय सामाजिक संस्था, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शिवसेना नेत्या तथा SSBSP प्रमुख रश्मीताई भोसले उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मनपा उपायुक्त संगिता नांदूरकर, समाजकल्याण उपायुक्त व्ही. वाघ, नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत, नगरसेविका संजिवनी हांडोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
यावेळी महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि निर्णयक्षम सक्षमीकरणावर मार्गदर्शन करताना अमोलभाऊ भागवत यांनी महिलांनी आव्हानांना सामोरे जात आत्मविश्वासाने यश संपादन करावे, अशी प्रेरणादायी भूमिका मांडली. तर रश्मीताई भोसले यांनी महिलांवरील अत्याचार, अन्याय आणि भेदभाव संपवण्यासाठी समाजाने एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा ‘महिला सक्षमीकरण गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित प्रत्येक महिलेला भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले, तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.
महिलांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













