ऋतुजा आत्महत्या प्रकरणी; धर्मांतर बंदी कायद्याची सकल हिंदू समाजाची मागणी
सातारा, दि. २ जुलै २०२५: सांगली येथील सात महिन्याच्या गर्भवती हिंदू भगिनी ऋतुजा सुकुमार राजगे हिच्या आत्महत्येप्रकरणी सातारा येथील सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाई आणि सक्त धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ख्रिश्चन धर्मांतरासाठी ऋतुजा यांना जबरदस्ती आणि अमानुष अत्याचाराला सामोरे जावे लागले. लग्नाच्या वेळी ख्रिश्चन कुटुंबाने स्वत:ला हिंदू म्हणवून फसवणूक केली आणि लग्नानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला. गर्भवती असताना त्यांना चर्चमध्ये ख्रिश्चन प्रार्थनेसाठी जबरदस्ती केली गेली, ज्यामुळे मानसिक तणावाखाली त्यांनी आपल्या अजन्मलेल्या बाळासह आत्महत्या केली.
सकल हिंदू समाजाने दोषी पती, सासू, सासरे आणि ख्रिश्चन धर्मगुरूंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून द्रुतगती न्यायालयात न्याय मिळवण्याची मागणी केली आहे. तसेच, अनधिकृत प्रार्थनास्थळे आणि होमचर्चद्वारे होणारे धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायदा लागू करण्याची विनंती केली आहे. धर्मांतराला विरोध करणाऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि आषाढी वारीत विटंबना करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी आहे.
विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, इस्कॉन, आर्ट ऑफ लिव्हिंग, हिंदू जागरण समिती, हिंदू एकता, धनगर, मातंग, वडार, मराठा, नाभिक समाजाचे प्रतिनिधी आणि सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक यांनी निवेदनाला पाठिंबा दिला आहे. अजय बर्जे, विजय काटवटे, वर्षाताई डहाळे, विक्रम पावस्कर, सचिन वाळवेकर, महेश शिवदे, मुकुंदराव आफळे, विजयराव गाढवे, अतुल शालगर यांच्या सह्या निवेदनावर आहेत.
सकल हिंदू समाजाने सरकारला आवाहन केले की, धर्मांतराच्या षडयंत्राला आळा घालण्यासाठी तातडीने कठोर कायदा लागू करावा.











