सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यात उद्या ‘बंद’; चक्का जाम आंदोलनाचे आवाहन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व अखंड मराठा समाजाचा निर्णय; अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
फलटण | दि. ६ सप्टेंबर २०२६
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणातील मागण्या शासनाने मान्य न केल्याच्या निषेधार्थ सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यात बंद आणि चक्का जाम आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व अखंड मराठा समाज, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी फलटण तालुक्यातील सर्व मराठा सेवकांनी सोमवारी सकाळी ठीक ९.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
व्यापारी, व्यावसायिकांनी बंदला सहकार्य करण्याचे आवाहन
बंदच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवून आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतूकदारांनीही बंदमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
प्रमुख रस्त्यांवर चक्का जाम
आंदोलनादरम्यान प्रमुख रस्ते व महामार्गांवर शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी संयम आणि शिस्त पाळावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
बंदमधून रुग्णालये, मेडिकल, दूध वितरण आणि रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. या सेवा नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात येणारे हे आंदोलन शंभर टक्के शांततेच्या आणि शिस्तीच्या मार्गाने पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आंदोलकांच्या वतीने करण्यात आले आहे.
“हा लढा आपल्या हक्काचा आणि भावी पिढीच्या भविष्याचा आहे.” त्यामुळे फलटण तालुक्यातील सर्व बंधू-भगिनी, व्यापारी, व्यावसायिक आणि वाहतूकदारांनी बंदला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शांतता राखा, संयम बाळगा आणि आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व अखंड मराठा समाज, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
एव्हीबी माझा
जनतेच्या प्रश्नांसाठी… सदैव आपल्या सोबत…












