साक्री ग्रामीण रुग्णालयात बायोमेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट नसल्यामुळे रुग्णांचे आरोग्य अधिकच धोक्यात
साक्री प्रतिनिधी : (विलासराव पाटील.) साक्री ग्रामीण रुग्णालयामध्ये फेरफटका मारला असता असे आढळून आले की, तेथील स्वच्छतागृह हे अस्वच्छ होते. तसेच बायोमेडिकल वेस्ट चे योग्य वेळी विल्हेवाट न लावल्यामुळे तेथील रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसते.
केंद्र शासनाच्या 2016 च्या कायद्यानुसार बायोमेडिकल वेस्ट याचे योग्य व्यवस्थापन करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून कोणाचे आरोग्य धोक्यात येणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी पाच प्रकारच्या वेगवेगळ्या कचऱ्याचे डबे बनवून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याचे दिशानिर्देश सगळ्या रुग्णालयांना देण्यात आले आहेत. परंतु येथील ग्रामीण रुग्णालयामधील बायोमेडिकल वेस्ट हे बाहेरच उघड्यावर टाकले जाते. तेच मेडिकल वेस्ट तेथील डुक्कर आणि कुत्रे इकडे तिकडे पसरवत असतात त्याकडे प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसते.
येथील वैद्यकीय अधीक्षकांचा तेथील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसते बऱ्याचशा सिस्टर या आशा कार्यकर्त्यांनी आणलेल्या डिलिव्हरीच्या केसेस ज्या साक्रीलासुद्धा डिलिव्हरी होऊ शकतात त्या जबरदस्तीने धुळ्याला पाठवतात. साक्री ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञसुद्धा खेड्यापाड्यावरचे जे पेशंट असतात त्यांचे रक्ताचे नमुने तपासायला स्पष्ट नकार देतात. त्यांचं म्हणणं असं आहे की, तुम्ही ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात त्याच ठिकाणी तुम्ही रक्ताचे नमुने तपासले पाहिजेत. पण आशा वर्कर्सच असं म्हणणं आहे की, जर आम्हाला खेड्यावरून कासारे जायचे आणि तिथून परत साक्री जायचं म्हणजे गरोदर मातेला फक्त रक्ताच्या नमुन्यासाठी एवढ गिरवायचं, आणि रस्त्यातच काही झालं तर ती जबाबदारी आमच्यावर येऊन पडते.तसा तर हा तालुक्याचा दवाखाना आहे. इथे सगळ्यांचे रक्त नमुने तपासलेच पाहिजेत, पण त्यांची मनमानी इथे दिसून येते.
आपल्या तालुक्यात चित्रित केला गेलेला आशा वर्करवरचा *”आशा”* हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्या चित्रपटांमध्ये यांचे बरेचसे किस्से काही आशा कार्यकर्त्यांनी न घाबरता कथित केलेले आहेत. असे वाटत होते की हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शासकीय रुग्णालयांमधील सगळ्या अडचणी संपलेल्या असतील. पण तसं काही झालेलं दिसून येत नाही.
याव्यतिरिक्त मंगळवार, बुधवार, गुरुवार तीन दिवस दोन व्यक्ती टपाल देण्यासाठी तिथे फिरत होते. तिथे क्लर्क जागेवर नसल्यामुळे ते टपाल देऊ शकले नाहीत. त्यात तर एक पोस्टमनच होता. ज्याने तीन दिवसापासून चकरा मारून तीन पाकीट त्यांचे सांभाळून ठेवले होते. त्यांची सोयसुद्धा एका समाज कार्यकर्त्यांमुळे झाली आणि तिथे वैद्यकीय अधीक्षकांना भेटण्याचा प्रयत्न केला तर वैद्यकीय अधीक्षकांची भेट झाली नाही. तसेच तेथील कर्मचाऱ्यांना क्लर्कचा नंबर विचारला किंवा काय अडचण आहे विचारलं तर कोणीही व्यवस्थित उत्तर द्यायला तयार नव्हते. तेथील कर्मचाऱ्यांना त्यांचे पदनाम त्यांचा मोबाईल नंबर याचा बोर्ड कुठे आढळून येत नाही. वास्तविक माहिती अधिकार कायद्यानुसार सगळ्या कार्यालयांना तेथील कर्मचाऱ्यांचे नावाचे फलक आणि पदनाम लिहून त्यांच्या मोबाईल नंबरची यादी सुद्धा कार्यालयाबाहेर लावायला सांगितलेले आहे. त्या गोष्टीकडे सुद्धा येथे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.
या गोष्टीकडे जिल्हा पातळीवरील वरिष्ठांनी स्वतः जातीने लक्ष घालून सदरील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांमधून व रुग्णांमधून व्यक्त होत आहे. आशा कार्यकर्त्याही या गोष्टीकडे आशा लावून बघत आहेत की, कधीतरी प्रशासनामध्ये सुधारणा होईल आणि आम्हाला सर्वसामान्य जनतेला न्याय देता येईल किंवा त्यांची हेळसांड थांबवता येईल.










