नर्मदा यात्रेतील सेवाभावी कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल; संत सेवक कैलास महाराज गवळी यांना ‘भारत गौरव पुरस्कार प्रदान
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
महाराष्ट्रातील नर्मदा यात्रा क्षेत्रात अनेक वर्षांपासून भाविकांची निस्वार्थ सेवा करणारे संत सेवक कैलास महाराज गवळी यांना प्रतिष्ठेचा ‘भारत गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याने भाविक व सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत सेवक कैलास महाराज गवळी यांनी नर्मदा परिक्रमा व नर्मदा यात्रेच्या माध्यमातून हजारो भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करत सेवा दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील भाविकांचा त्यांच्यावर दृढ विश्वास निर्माण झाला आहे. या उल्लेखनीय कार्यामागे अनेक सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे कैलास महाराज गवळी यांनी नमूद केले. विशेषतः गुलाबदादा माळी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच बबलूदादा वाघळीकर, विजय पाटील मुन्खेडेकर, भूषणदादा मुन्खेडेकर आणि सुपडूदादा वाघळीकर यांनीही विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. याशिवाय, या यशामध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा आपल्या सुविद्य पत्नी रूपाली गवळी यांचा असल्याचे कैलास महाराज गवळी यांनी आवर्जून सांगितले. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी दिलेली साथ, प्रोत्साहन आणि सहकार्य यामुळेच समाजसेवा व धार्मिक कार्य अधिक जोमाने करता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारत गौरव पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील नर्मदा यात्रा सेवेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली असून, हा सन्मान समाजसेवा आणि अध्यात्माच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पुरस्कारप्राप्तीनिमित्त संत सेवक कैलास महाराज गवळी यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भाविक आणि हितचिंतकांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













