जीएसटी दरकपात: सामान्य माणसाच्या समृद्धीचा नवा मार्ग – आमदार सिद्धार्थ शिरोळे
सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेल्या जीएसटी दर पुनर्रचनेच्या संकल्पाला आता प्रत्यक्ष रूप प्राप्त झाले आहे. यामुळे सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल, असा विश्वास भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्र सरकारने जीएसटी कररचनेत केलेली ही सर्वात मोठी सुधारणा अर्थव्यवस्थेला गती देईल आणि व्यापाराला प्रोत्साहन मिळेल. मागणी व उत्पादन वाढल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि कुटुंबांची आर्थिक समृद्धी वाढेल, असे शिरोळे म्हणाले. जीएसटी परिषदेने एकमताने या सुधारणांना मान्यता दिली असून, सध्याच्या चार स्तरांच्या कररचनेला 18% आणि 5% अशा दोन स्तरांत सुसूत्रित करण्यात आले आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा कमी होईल.
शिरोळे यांनी सांगितले की, 2014 पर्यंत देशाची आर्थिक प्रगती संथ होती. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ 2.04 ट्रिलियन डॉलर्स होते, भ्रष्टाचार आणि महागाईमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. मात्र, मोदी सरकारने जीएसटीसारख्या सुधारणांद्वारे पारदर्शकता आणि गतिमानता आणली. 1 जुलै 2017 पासून लागू झालेल्या जीएसटीमुळे 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले असून, भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात कोणाचेही सरकार असले तरी जीएसटी दरकपातीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघु-मध्यम उद्योजक, महिला आणि युवकांना लाभ होईल. काँग्रेसच्या राजकीय टीकेला प्रत्युत्तर देताना शिरोळे म्हणाले, “मोदी सरकार सर्व वर्गांच्या कल्याणासाठी विकासाचे राजकारण करत राहील.”













