सस्तेवाडी येथील खून प्रकरणी जय मल्हार क्रांती संघटनेचे ग्रामीण पोलीस ठाण्यास निवेदन
फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडलेल्या गणेश बाळू मदने यांच्या खून प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण येथे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. ६ रोजी सस्तेवाडी येथील गरीब कुटुंबातील शेतकरी गणेश बाळू मदने हे त्यांच्या शेतात असताना वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या काही इसमांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोकशाही मूल्यांवर आघात झाला आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, मृताच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा तसेच या घटनेचा तपास फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तपासात कोणतीही दिरंगाई किंवा कसूर झाल्यास संपूर्ण रामोशी समाज व जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर जय मल्हार क्रांती संघटनेचे फलटण तालुका अध्यक्ष गणेश हणमंत मदने यांची स्वाक्षरी असून, यावेळी फलटण तालुक्यातील रामोशी समाजाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.













