कोरपना तालुक्यात पावसाचा तुटवडा तीव्र; पिकांचे प्रचंड नुकसान

कोरपना तालुक्यात पावसाचा तुटवडा तीव्र; पिकांचे प्रचंड नुकसान

शिवसेनेची तातडीने पंचनाम्याची मागणी; 15 दिवसांत मदत न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा

चंद्रपूर : 

कोरपना तालुक्यात यंदाच्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाने अक्षरशः दगा दिला आहे. संपूर्ण तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यल्प राहिल्याने खरीप हंगाम कोलमडण्याच्या मार्गावर आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना धास्ती बसली होतीच, त्यात नंतर अचानक झालेल्या खंडामुळे सोयाबीन, तूर, हरभरा, भात, मका, भाजीपाला आदी प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ओलाव्याअभावी काही भागांत तर पिके कोमेजून वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी, पेरणी, बियाणे, मशागत, ठिबक व खतांवर मोठी गुंतवणूक केली होती. मात्र पावसाच्या दुष्काळी स्थितीमुळे संपूर्ण खर्च वाया जाण्याची वेळ आली आहे. अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांचे दिवाळीपर्यंतचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख डॉ. प्रकाश निळकंठराव खनके यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन देत तालुक्यातील सर्व गावांमध्ये तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई वाटप करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सलग दोन महिन्यांतील पावसाचे प्रमाण 65 मि.मी. पेक्षा कमी असल्याने खरीप पिकांची वाढ ठप्प झाली आहे. पिकांची उंची नीट न येणे, पाने पिवळी पडणे, तणे न फुटणे, रोपांची वाढ खुंटणे असे प्रकार दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली असताना आता सर्व गुंतवणूक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

“दिवाळी जवळ आली आहे. पण शेतकऱ्यांच्या हातात एकही रुपया नाही. पिके वाचवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतात तेवढे केले; पण आभाळानेच धोका दिला. अशा स्थितीत शासनाने तातडीने मदत केली नाही तर हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडतील,” असे डॉ. खनके यांनी सांगितले.

तालुक्यातील कोरपना, नांदा, नारंडा या मंडळांतील शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. तहसीलदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शासनाकडून अधिकृत पत्र प्राप्त न झाल्याने नुकसानभरपाई प्रक्रिया रखडली आहे; तथापि पत्र येताच तत्काळ मदत वाटप करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची टंचाई वाढत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत. पशुधन वाचवण्यासाठी तातडीने पिण्याचे व चाऱ्याचे नियोजन करण्याची मागणीही शिवसेनेतर्फे करण्यात आली.

या निवेदनाची प्रत आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी राजुरा यांना पाठविण्यात आली आहे. पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा डॉ. प्रकाश खनके व सुरेशदादा खोबरकर यांनी दिला आहे.

या वेळी डॉ. प्रकाश खनके (माजी तालुकाप्रमुख), सुरेशदादा खोबरकर (शिवआरोग्य सेना समन्वयक, राजुरा), लक्ष्मण कोंगे (माजी शहरप्रमुख), राकेश खोबरकर, पुंडलीक पावडे, मनोज गोरे, खैरे, निरंजने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मात्र शासनाने तातडीने मदतनिधी, बियाणे–खत अनुदान, पाणीटंचाई निवारण योजना आणि दुष्काळ जाहीर करून दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

पावसाची प्रतिकूल स्थिती कायम राहिल्यास खरीप हंगाम पूर्णतः अयशस्वी ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें