बातमी (एव्हीबी माझा)
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध; पूर्वसूचना न देता मीटर बसविणे थांबविण्याची मागणी
साखरवाडी, दि. १९ जू २०२६ : साखरवाडी परिसरातील होळ गाव व आसपासच्या भागात वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना, लेखी माहिती अथवा संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात, वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत पुरेशी माहिती न देता तसेच त्यांच्या शंकांचे निरसन न करता मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
ग्राहकांना योग्य माहिती देऊन, त्यांचे म्हणणे ऐकून व आवश्यक जनजागृती केल्यानंतरच स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया राबवावी. तोपर्यंत हे काम तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, राज्य प्रवक्ते प्रमोदजी गाडे, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले आणि दासाराम भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत












