साताऱ्यात संविधान रक्षणासाठी सर्वपक्षीय महामोर्चाचा हुंकार;
वकील राकेश तिवारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी
दलित समाजाच्या सुरक्षेसाठी बैठक घेण्याची मागणी
उमेश लांडगे (सातारा): सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी यांच्या कृत्याविरोधात सातारा जिल्हा संविधान रक्षणाच्या लढ्यासाठी एकवटला. तिवारी यांनी सरन्यायाधीशांवर बूटाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, साताऱ्यातील संविधानप्रेमी संघटना, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षभेद विसरून भव्य महामोर्चाचे आयोजन करत तिवारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. संविधान संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. तिवारी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या योग्य कलमांनुसार तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी मोर्चातून करण्यात आली. विशेषतः न्यायमूर्ती गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यासोबतच, कोरेगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनेही सातारा जिल्ह्यातील दलित समाजाच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणी लक्ष घालण्याची आणि दलित समाजाच्या सुरक्षेसाठी त्वरित बैठक घेण्याची विनंती केली. “सातारा जिल्ह्यात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे गायकवाड यांनी ठणकावून सांगितले. या महामोर्चात अशोकराव गायकवाड, वर्षाताई देशपांडे, अरुणजी गाडे, संजय गाडे, दादासाहेब ओव्हाळ, गणेश भिसे, चंद्रकांत खंडाईत, सत्यवान कमाने, उमेश खंडजोडे एडवोकेट वाहागावकर, सादिक बागवान, सुरेश कोरडे, अमोल आवळे, रामदास कांबळे, स्वप्नील गायकवाड, युवराज कांबळे, यांच्यासह हजारो संविधानप्रेमींनी संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने आवाज बुलंद केला. हा मोर्चा साताऱ्यातील सामाजिक एकतेचे आणि संविधानावरील निष्ठेचे प्रतीक ठरला. संविधानाच्या रक्षणासाठी सातारा एकवटला, आता कारवाईची प्रतीक्षा!













