ब्लॅकआउट जाहिर होताच नागरिकांनी आवश्यकती दक्षता घ्यावी: जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा: युद्ध अथवा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेच्या कारणास्तव शासनाकडून ब्लॅकआउट (पूर्ण अंधार) जाहीर केला जातो. अशावेळी विमानहल्ला, शत्रूची नजर चुकविणे किंवा सामूहिक सुरक्षितता यासाठी प्रकाश बंद ठेवणे अत्यंत आवश्यक असते. युद्धजन्य परिस्थितीत ब्लॅकआउट च्या वेळी काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
ब्लॅकआउट जाहिर होताच नागरिकांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
सर्व प्रकारचे प्रकाशाचे स्रोत बंद करा. घरातील, बाल्कनीतील व घराबाहेरील दिवे, टीव्ही बंद करा. खिडक्या, दरवाजे बंद करा व जास्तीत-जास्त काळोख ठेवण्यासाठी जाड पडदे लावा किंवा ब्लॅकआउट शीट वापरा. इमर्जन्सी लाइट/टॉर्चमध्ये ब्लू किंवा रेड फिल्म लावा. त्यामुळे प्रकाश लांबून जाणवत नाही. शासकिय व प्रशासनाच्या अधिकृत सूचना रेडिओ व सार्वजनिक घोषणांद्वारे व्यवस्थित ऐका व त्याचे तंतोतंत पालन करा. घरात रहा: शक्यतो घराच्या मध्यभागी रहा जिथे संरक्षण जास्त असेल.प्रथमोपचार किट, पाण्याचा साठा, टॉर्च व कोरडे अन्नपदार्थ (बिस्कीट, फरसाण इ.) जवळ बाळागा. मोबाईल नेटवर्क, विजेवर अवलंबून न राहता पॉवर बँक/रेडिओचा वापर करा. संशयास्पद वस्तुस स्पर्श करू नका. तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.वृध्द व्यक्ती, अपंग व्यक्ती, लहान मुले व आजारी व्यक्तींची विषेश काळजी घ्या.
तसेच ब्लॅकआउट जाहिर होताच विनाकारण घराबाहेर फिरू नका. कारण हल्ला किंवा चुकून सैनिकांना संशय येऊ शकतो. प्रकाश पसरू देऊ नका. फ्लॅशलाइट, मोबाईल स्क्रीन यांचा प्रकाश बंद करावा. गोंधळ किंवा अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. सायरन अथवा अर्लटकडे दुर्लक्ष करू नका. सतर्क राहा, वेळेवर सुरक्षितस्थळी पोहोचा. शासकीय आदेशांकडे दुर्लक्ष करू नका. सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा. विनाकारण एकाच ठिकाणी जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होवू नये.













