आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज केलेल्यांनी कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नयेत – उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडून वितरीत करणेत येणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र चालविणेसाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील CSC-SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रचालकांकडून आणि CSC-SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविणेत आलेले आहेत.
आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असलेने, नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करु नयेत. याकामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन माहे मार्च महिन्यातच विविध माध्यमांतून करुन नागरिकांना सतर्क राहणेबाबत कळविणेत आलेले आहे.
आपले सरकार सेवा केंद्र मिळणेसाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना पुनश्च आवाहन करणेत येते की, आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेबाबत या कार्यालयामार्फत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करु नयेत. याकामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक ०२१६२-२३२१७५ वर तात्काळ संपर्क साधावा. अथवा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हाधिकारी सातारा, अपर जिल्हाधिकारी सातारा, निवासी उपजिल्हाधिकारी सातारा व उपजिल्हाधिकारी (महसूल) यांचेशी समक्ष संपर्क साधावा व अशी बाब निदर्शनास आणावी. तसेच याबाबत अन्य कोणतेही खाजगी इसम यांचेकडे याकामासाठी संपर्क साधू नये,असे आवाहन उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. अर्जदारांनी त्रयस्थ व्यक्तींबरोबर व्यवहार केल्याच्या अशा प्रकारची कोणत्याही स्वरुपाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यास जिल्हाधिकारी कार्यालय व कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले आहे.













