तहसीलदारांच्या लेखी उत्तरानंतर प्रहारचे ठिय्या आंदोलन स्थगित
2 तास तहसील कार्यालयात ठिय्या!
फलटण: प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज दिव्यांग बांधवांचे तहसील कार्यालयात विविध मागण्यांसाठी सुमारे 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करून दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले गेले.
यामध्ये ज्या दिव्यांग लोकांना घरकुल साठी जागा नाही त्यांचे प्रस्ताव पुढे पाठवण्यात येणार आहेत.तसेच संजय गांधी निराधार योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे अडचणी येत आहेत त्यावर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्र व्यवहार करून कर्मचारी मागणी करण्यात येणार असून तोपर्यंत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला. तसेच दिव्यांग बांधवांना रेशनिंग धान्य मिळत नाही त्यांची प्रकरणे मार्गी लावण्यात आली. तसेच जे रेशन पुरवठादार पावत्या देत नाहीत , धान्य पुरवठा हा जाणून बुजून महिन्याच्या शेवटचे दिवशी करतात त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
याबाबत पुरवठा विभागाने संघटनेला लेखी पत्र दिले आहे. यामध्ये म्हटला आहे की वरील विषयाकित संदभर्भाधीन पत्रास अनुसरुन आपणांस कळविणेत येते की, फलटण तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी यांना प्रत्येक रास्तभाव दुकानामध्ये प्राधान्याने धान्य देणे, बसणेसाठी बसणेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मालाची पावती देणे इ.रास्तभाव दुकानदार यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी दिव्यांग लाभार्थी यांना रास्तभाव दुकानदार यांच्याकडून कोणतीही अडचण/त्रास होणार नाही तसेच दिव्यांग बांधवाना प्राधान्याने इष्टांक उपलब्ध करुन देणेत येईल. त्या प्रमाणे ज्या रास्तभाव दुकानदार यांचेबाबत बैठकीत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची पडताळणी करुन त्यांचेवर उचित कारवाई करणेत येईल.तसेच कोणती अडचण उदभवल्यास श्री. नितीन कांबळे पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व इतर दिव्यांग बांधवाना हि सदर पत्राची माहिती दयावी.













