ग्रामविकास मंत्र्यांवर आरोप करणारी महिला एक कोटीची खंडणी घेताना जेरबंद
सातारा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने माध्यमांसमोर येऊन आरोप केले होते. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. विधानसभेत आणि विधान परिषदेत याचे पडसाद उमटले होते. आज या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात पकडले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महिलेला अटक केल्याचे समोर आले आहे. सोबतच या महिलेने संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती अशी माहिती समोर येत आहे.
ज्या प्रकरणी महिलेने खंडणी मागितली आहे ते प्रकरण 2017 मधील होते. याप्रकरणी न्यायालयाने 2019 मध्ये मंत्री जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर पुन्हा या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत राज्यपालांना पत्र लिहून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्याआधीच या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद केले आहे.









