शिवाजी घाट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळील अतिक्रमण काढण्याची रहिवाश्यांची मागणी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
चाळीसगाव शहरातील शिवाजी घाट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. या पुतळ्याच्या आजूबाजूला भाजीपाला हात गाड्या तसेच नास्ताच्या गाड्या या लागत असतात, त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पहावयास मिळते, शासनाने याची दखक घेऊन पुतळा जवळ लागणाऱ्या हात गाड्यांना प्रतिबंध कराव्यात अशी मागणी या परिसरातील रहिवाश्यांनी नगर पालिका व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व खालील सह्या करणारे सर्व शहरातील रहिवाशी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुर्वीपासून जुने स्मारक शिवाजी घाट येथे आहे. गेल्या कित्येक वर्षापासून महाराजांची मिरवणुक व विविध कार्यक्रम सदर ठिकाणी केले जातात. परंतू शिवाजी महाराज यांचे स्मारकाला लागूनच गावातील काही लोकांनी येथे भाजीपालाचा व्यवसाय सुरु केला आहे. तसेच स्मारका लगतच मासेविक्री व इतर अमली पदार्थ जसे (भांग, गांजा व दारु) या पदार्थांची सर्रासपणे दिवसा ढवळ्या विक्री केली जाते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना होत असते
त्यामुळे नगर पालिकेने याबाबीकडे लक्ष वेधून या ठिकाणचे अतिक्रमण तात्काळ काढून सदर ठिकाणी शासनाचा फलक लावावा जेणेकरून भविष्यात महाराजांच्या स्मारका जवळ कोणीही अतिक्रमण करणार नाही व अमली पदार्थ विकणार नाही. शासनाने दि.१९ फेब्रुवारी पर्यंत याची दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा दि.२० फेब्रुवारी पासून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर निलेश साळुंखे, शुभम देशमुख, अनिल चौधरी, निलेश भडक, संतोष महाजन यांच्या जयशिव मल्हार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहे.













