जिल्हयातील महाविद्यालयांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा लाभ घ्यावा
सातारा दि. : शासनाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. त्या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती हेण्यासाठी तसेच कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक व युवतींना व्हावा, विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी स्वतःच्या महाविद्यालयांत उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील महाविद्यालयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत जिल्हयातील इच्छूक महाविद्यालयांत कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना भविष्यातील कौशल्य अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या करीता केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्म नुसार कौशल्य विकास केंद्रांना विविध टप्प्यांमध्ये प्रति प्रशिक्षणार्थी सरासरी रु. ९ हजार ते १५ हजारापर्यंत प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येते.
“आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” स्थापन करण्यासाठी महाविद्यालयांनी https://docs.google.com/forms/d/e/۹FAIpQLSeYeQHCVr°z8YeoRYMICJwqXzUtFvHGlua Im३३1XxeM४६ng/viewform या लिंकवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बस स्थानकाच्या बाजूला, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, सातारा या ठिकाणी किंवा ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.











