महिला समुपदेशन केंद्र तुटलेली नाती जोडण्याचे एक प्रभावी माध्यम, चाळीसगावमध्ये १२ वर्षांत १८२५ प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली, समुपदेशक पूनम जगदाळे यांचे उल्लेखनीय कामगिरी
दरवर्षी ८ मार्च हा सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असतो. या दिवसाचा उद्देश महिलांच्या कार्याचा सन्मान करणे आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हा असतो. असाच प्रकारे चाळीसगाव येथे देखील पोलिस स्टेशन अंतर्गत महिला समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांमध्ये समेट घडवून आणण्याचे काम समुपदेशक पूनम जगदाळे व त्यांचे सहकारी श्रीराम राठोड हे सातत्याने प्रभावीपने करत आहे. या केंद्रात गेल्या बारा वर्षा पासुन आता पर्यंत १८५६ खटले समुपदेशनासाठी आले होते, त्यापैकी १८२५ खटले यशस्वीरीत्या निकाली लागले आहे, तर ३१ खटले सध्या प्रलंबित आहेत. चालू वर्षाचा विचार केला तर १ एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत १५० खटले दाखल झाले होते, त्यापैकी ११९ खटले निकाली काढण्यात यश आले आहे, तर ३१ खटले प्रलंबित आहेत. ही आकडेवारी महिला समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचे आणि महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू असल्याचे दर्शवते. महिला समुपदेशन केंद्र एक स्वयंसेवी संस्था आहे, या केंद्रात महिलांना मानसिक आधाराबरोबर कायदेशीर सल्ला व सामाजिक मदतही इथे मिळते. त्यामुळे महिलांना इथे त्यांच्या अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते आणि त्या आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात. समाजानेही महिलांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर समानतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. महिला समुपदेशन ही केवळ एक सेवा नसून समाजात सकारात्मक बदल घडवणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे समुपदेशनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
प्रतिनिधी रणधीर जाधव, AVB महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव












