जम्मू काश्मीर येथे अडकलेले चाळीसगाव तालुक्यातील सर्व १४ पर्यटक सुरक्षित, आमदार मंगेश चव्हाण यांनी फोनवरून साधला पर्यटकांशी संवाद
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव): –
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटक मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. या दुःखद घटनेमुळे देश हादरला असून जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत चाळीसगाव तालुक्यातील १४ पर्यटक जम्मू आणि काश्मीर मध्ये अडकले असून देशमुख यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते. त्यात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा देवयानी ठाकरे यांचा देखील समावेश आहे. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्याच ठिकाणी आदल्या दिवशी चाळीसगाव तालुक्यातील पर्यटक भेट देऊन आले होते. सुदैवाने आता सर्व १४ पर्यटक सुखरूप असून आमदार मंगेश चव्हाण यांनी फोनवरून त्यांची चौकशी करत संवाद साधला आहे. या अडचणीच्या वेळी पूर्ण देशाच्या संवेदना आपल्या सोबत असून अडकलेल्या सर्व पर्यटकांना येत्या 1 ते 2 दिवसात सुखरूपपणे घरी पोहचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे माझा पाठपुरावा सुरू असून शासन देखील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगत सर्वांना धीर दिला. गरज पडली तर मी स्वतः तिथे येईल तसेच मी त्यांचे तिकीट काढून विमानाने घरी आणेल पण कुणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले. जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदतकार्य व त्यांना सुखरूपपणे राज्यात आणण्यासाठी समन्वयक म्हणून आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे देखील थेट जम्मू काश्मीरला रवाना झाले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संवाद साधत त्यांना चाळीसगाव तालुक्यातील अडकलेल्या १४ पर्यटकांची माहिती दिली आहे, व त्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवून परत आणण्याची विनंती देखील आमदार चव्हाण यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे.













